आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सफाई कामगारांमुळेच समाजाचे आरोग्य सुदृढ – शेरसिंग डागोर

▪️घरकुलासाठी तातडीने आराखडा; प्रलंबित प्रश्नांसाठी नोडल अधिकारी नेमा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 09 : सफाई कर्मचारी हा समाजाचा अविभाज्य आणि महत्वपूर्ण घटक आहे. स्वतः अनेक अडचणी आणि आरोग्यविषयक जोखमींचा सामना करून ते समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यांच्यामुळेच आपल्या समाजाचे आरोग्य सुदृढ राहते. समाजाप्रती त्यांचे असलेले योगदान लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडवाव्यात, अशा सुचना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश, नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, उमेश पिपरे, सुनील तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. डागोर म्हणाले, शहराच्या संपूर्ण स्वच्छतेची मोठी जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. अत्यंत कमी वेतनात तसेच विविध व्याधी आणि आरोग्यविषयक जोखमींचा सामना करत ते निरंतर सेवा देतात. सफाई कर्मचारी कामावर नसतील तर त्याचा थेट परिणाम शहराच्या स्वच्छतेवर आणि समाजाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने लक्षात घेतले पाहिजे.

कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या सेवेचा उल्लेख करताना ते म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सेवा दिली. अनेक कुटुंबांचे नातेवाईक दूर असताना सफाई कर्मचाऱ्यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीसुद्धा पार पाडली. त्यांच्या या योगदानाची जाणीव ठेवून प्रशासनाने त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अधिक संवेदनशीलतेने कार्य करावे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत.

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा नियमित पाठपुरावा करून ते निर्धारित वेळेत निकाली काढण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा. संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेळेत सोडविण्याचे योग्य नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचनाही महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी यावेळी दिल्या.

लाड-पागे समितीच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करा : राज्य शासन, सफाई कामगारांच्या कल्याणासाठी जागरूक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सफाई कामगारांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र, लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीत काही ठिकाणी गांभिर्याने काम झालेले दिसून येत नाही. यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निदर्शनास आणून त्यांचा नियमानुसार निपटारा करावा.

नियमित आरोग्य तपासणी व विमा संरक्षणावर भर : सफाई कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना विमा संरक्षण, किमान वेतन तसेच इतर देय सुविधा वेळेत मिळतील, याची संबंधित यंत्रणांनी खातरजमा करावी. ज्या बँकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाते, त्या बँकेच्या माध्यमातून त्यांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण तसेच अपघाती मृत्यू झाल्यास एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

घरकुलासाठी तातडीने आराखडा तयार करा : लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. डागोर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने आराखडा तयार करावा. सफाई कर्मचाऱ्यांचे राहणीमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, अशा सूचना श्री. डागोर यांनी दिल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.