ग्रामसभेच्या बनावट दाखल्याप्रकरणी माजी ग्रामसेवक, सरपंचावर गुन्हा दाखल….
सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी
दहिसरतर्फे मनोर(इंडिया 24 न्यूज )ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांनी ग्रामसभेच्या मू
ळ दस्तऐवजामध्ये समावेश नसलेल्या बाबींचा अंतर्भाव करून ग्रामसभेची मान्यता असल्याचा खोटा बिनशेती दाखला दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ‘ना हरकत दाखला’ दिल्याप्रकरणी कोकण विभागाच्या सहायक आयुक्तांच्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी पालघरच्या न्यायालयात धाव घेतली आहे.
रमेश रामनारायण सिंह ठाकूर यांनी कुडे गावातील अकृषिक (एन.ए.) बिनशेती परवानगी ना हरकत दाखल्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी विजय बिल्लेवार आणि तत्कालीन सरपंच दशरथ लहू जाधव यांनी ३१ ऑगस्ट २०२० रोजी ग्रामसभा न घेता मासिक सभेमध्ये ठराव मंजूर करून ग्रामसभेच्या मूळ दस्तऐवजांमध्ये समावेश नसलेल्या बाबींचा अंतर्भाव केला आणि ग्रामसभेची मान्यता असल्याचा खोटा बिनशेती परवानगी ‘ना हरकत दाखला’ ठाकूर यांना दिला होता. त्यामुळे फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्याने पालघर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजू कोळी यांच्या फिर्यादीवरून विजय बिल्लेवार आणि दशरथ जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ग्रामपंचायतींमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
फौजदारी गुन्हा केल्याचे स्पष्ट
दाखला देताना अनियमितता केल्याचे निदर्शनास आल्याने बिल्लेवार यांच्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात कर्तव्यात कसूर करून कामात सचोटी व कर्तव्याचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आरोप सिद्ध होत असल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.