आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीचा निर्णय रद्द..

▪️मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वसनाची केली पूर्तता, आ. जोरगेवार यांनी मानले आभार..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी या आश्वासनाची पुर्तता करत स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीचा निर्णय रद्द केला आहे. त्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
स्मार्ट प्री-पेड वीज मीटर बाबत जनतेमध्ये रोष होता. त्यामुळे जनतेला मान्य नसलेल्या या मीटर जोडणीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेत केली होती. मुंबई मंत्रालय येथे झालेल्या या भेटीत सकारात्मक चर्चा झाली होती. त्याचा परिणाम आज दिसून आला असून सदर मिटर लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
वीज ही सामान्य नागरिकांची प्राथमिक गरज आहे आणि सरकारने ती माफक दरात पुरवणे आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जात असताना, महाराष्ट्रात वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. वीज बिलात समाविष्ट असलेल्या विविध कर आणि शुल्क हे दरवाढीचे प्रमुख घटक आहेत. शासनाच्या नवीन वीज कर धोरणानुसार सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडण्याची सक्ती करण्यात येत होती. ग्राहकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्ट प्री-पेड वीज मीटर लावले जात होते. जुने वीज मीटर पोस्ट-पेड असल्याने ग्राहकांना थकीत बिल भरण्याची मुभा होती, त्यामुळे ते आपल्या सोयीनुसार वीज देयक भरण्यास सक्षम होते. मात्र, स्मार्ट प्री-पेड वीज मीटरमुळे पुरेशा रिचार्ज अभावी वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार होता.
रिचार्ज मीटरमुळे वीज कंपन्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांवर निश्चित बोझ्या व त्रास वाढणार होता. अनेक नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा असतील याची शाश्वती नसते, त्यामुळे त्यांना रिचार्ज प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता होती. तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या या नव्या मिटरमुळे निर्माण झाली असती. आदी बाबी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या. त्यानंतर आता सदर प्री-पेड मिटर लावण्याचा निर्णय सरकारने रद्द करत विज ग्राहकांना दिलासा दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.