▪️भारतीय क्रिकेट संघाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सत्कार करा – आ. किशोर जोरगेवार
▪️अधिवेशनात केली मागणी..
राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
मुंबई – ( इंडिया 24 न्यूज ) : भारतीय क्रिकेट संघाने विश्वकप जिंकून देशाचा डंका जगात वाजविला आहे. त्यांनी देशवासीयांना एक मोठा आनंदाचा क्षण दिला आहे. त्यांच्या या सर्वोच्च प्रदर्शनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाचा सत्कार करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे. याची दखल घेऊन याबाबत सभापती डॉ. राहुल नार्वेकर यांनी उद्या बैठक घेण्याचे ठरविले आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तशीच ती क्रिकेटची सुद्धा राजधानी आहे. अनेक मोठे स्टेडीयम येथे आहे. अनेक मोठे खेळाडू येथे घडले आहे. क्रिकेटचा देवता भारतरत्न सचिन तेंडुलकर याच महाराष्ट्रात घडला आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि शेवटच्या क्षणी उत्तम झेल टिपून वर्ल्ड कपची ट्रॉफी भारताच्या पदरात टाकण्यात मोठी भूमिका निभावणारा सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हा सुध्दा याच राज्याचा आहे. ही राज्यासाठी गौरवाची बाब असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
2023 ला झालेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता.तो सामना आम्ही शहराच्या मुख्य चौकात मोठ्या स्क्रीनवर दाखवला होता. यावेळी भारत संघाचा पराभव झाल्यावर नागरिकांच्या भावना पाहता ते या खेळाशी भावनिक जुळले असल्याचे स्पष्ट जाणवले. मात्र आता वर्ल्ड कप जिंकत भारतीय संघाने आनंद उत्सव साजरा करण्याची संधी देशाला दिली आहे. त्यामुळे अशा उत्कृष्ट संघाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरव करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यातील खेळाडूंचा सत्कार करण्याची मागणी सभागृहात केली होती. त्यानंतर संपूर्ण संघाचा सत्कार करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली. याची दखल सभापती डॉ. राहुल नार्वेकर यांनी घेतली असून उद्या या संदर्भात बैठक बोलावली आहे.