चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांना अटक करा: टिपू सुलतान विचार मंच..
*🔹श्री राजु शंभरकर*
*🔹चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔹मो नं. 9511673435*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : टिपू सुलतान विचार मंच चंद्रपूर द्वारे आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथील पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांना अटक करा! अशी मागणी एक तक्रार देऊन करण्यात आली आहे. टिपू सुलतान विचारमंच चे अध्यक्ष जुबेर फिरोज आझाद यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की
भारत देश हा विविधतेत एकता असलेला देश आहे, सामाजिक एकता टिकून राहणे हे आपल्या देशासाठी अत्यंत आवश्यक आहे. न्याय, समता, बंधुता मूलभूत तत्वे स्थापित करणे हे देशाचे उद्दिष्ट असेल हे संविधानाच्या उद्देशिकेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु राज्यातील काही लोक जाणीवपूर्वक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. हिंदू मुस्लीम असा भेद निर्माण करून राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न करत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे सातत्याने भडकाऊ विधाने करत आहेत.दिनांक १ सप्टेंबर रोजी नितेश राणे यांनी अहमदनगर मधील जाहीर कार्यक्रमात मुस्लीम समाजाविरोधात अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली असून थेट मारण्याची धमकी दिली, बुलडोझर चालवण्याची धमकी दिली. रामगिरी महाराज यांनी ही दोन धर्मात तेढ निर्माण करणारे विधान केलेले आहे. रामगिरी महाराजांवर अटकेची कारवाई अद्याप झालेली नाही.या बाबत ही तक्रारीत सांगण्यात आले आहे.
आमदार नितेश राणे सातत्याने धमकी देण्याची भाषा करत असताना तेथील पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत हे दुर्दैवी आहे. कायदा हा सर्वांना समान आहे. नितेश राणे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांना विशेष सुट दिली जात आहे का ? नितेश राणे आपला बाप सागर बंगल्यावर आहे असे म्हणतात म्हणूनच पोलिसांचे हात बांधलेले आहेत का ? असे प्रश्न देखील टिपू सुलतान विचारमंच चे अध्यक्ष यांनी तक्रारीच्या माध्यमातून केले आहे.
पोलीस हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना अतिरेकी, गुन्हेगार असल्यासारखी वागणूक देत आहेत. पोलीस सत्ताधारी व विरोधक यांना वेगळी वागणूक देत आहेत. असेही तक्रारीत नमूद केले आहे.
मुंबईमध्ये देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदार संघात जाऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होणार आहे असे दिसते.
भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांची मागील सहा महिन्यातील केलेली सर्व विधाने तपासून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेल असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
रामगिरी महाराजांचे वक्तव्य पाहता त्यांच्यावरही कारवाईची आम्ही मागणी करत आहोत. तसेच हेतुपुरस्सर दोन धर्मात आणि जातीमध्ये वाद निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवर सततची चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांची सुरक्षा तात्काळ काढून घेण्यात यावी. आपण आमच्या मागणीचा गांभिर्याने विचार करुन तातडीने कारवाई करावी अशी विनंती टिपू सुलतान विचारमंच चे अध्यक्ष, इंजी. जुबेर फिरोज आज़ाद यांनी केली आहे.
चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना तक्रार देतेवेळी जुबेर फिरोज आजाद, डॉ.जाकिर हुसेन क्रीडा मंडळ चे संस्थापक अध्यक्ष सय्यद रमजान अली,
इमरान खान बाबा भाई, हाजी फैसल पाशा, आबिद शेख, अबुल हुसैन शेख, दानिश शेख, उपस्थित होते.