▪️प्रधानमंत्री पिक विमा योजना: शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सौ. शिल्पा बनपुरकर : संपादक
धुळे – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 17 जुलै, 2025 : खरीप हंगाम 2025 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी 31 जुलै, 2025 पुर्वी आपला पिकाचा विमा हप्ता भरुन या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुरज जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, किड रोग व पिकाचे नुकसान भरपाईसाठी ही योजना उपयुक्त आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 16 जुलै, 2025 अखेर 6 हजार 526 शेतक-यांनी सहभाग नोंदवला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये पावसाच्या संततधारेमुळे बहुतांश ठिकाणी मशागतीची व पेरणीची कामे खोळंबली आहेत. ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे, तेथील पीकाचे सततच्या पावसाने नुकसान होणेची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नैसर्गिक आपत्ती, किडरोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतक-याचे स्थैर्य अबाधित राखणेसाठी शासनाने खरीप हंगाम 2025 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना पुढे सुरु ठेवणेस मान्यता दिली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय, महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्र अधिसूचित केली असून त्याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मूग, कापूस, मका, तूर, उडीद व खरीप कांदा या 13 पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ही योजना लागू असून या योजनेमध्ये सहभागी होणेसाठी अंतिम मुदत 31 जुलै 2025 अशी आहे. बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तिकरित्या आपले अर्ज विमा कंपनीस सादर करुन अथवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारेही या योजनेत सहभागी होऊ शकतात.
योजनेत सहभागी होणेसाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतक-यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवती बँकेत आपले खाते आहे. त्याबँकेत जाऊन अथवा पोस्ट कार्यालय, विमा कंपनी एजंट, सार्वजनिक सुविधा केंद्र व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे 31 जुलै 2025 आपला पिकाचा विमा हप्ता भरुन या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहीतीसाठी गाव पातळीवरील सहाय्यक कृषि अधिकारी, मंडल कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.जगताप यांन केले आहे.