◼️ सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही: ( इंडिया २४ न्युज )
सिंदेवाही तालुक्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसीलदारामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील तलाव,बोड्या, नद्या आणि नाले कोरडे पडले असून शेत जमिनीला भेगा पडल्या आहेत. धान पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी केलेली रोपवाटिका व रोपाची लागवड पाण्याअभावी सुकत आहे. अनेक ठिकाणी अद्याप रोवणी होऊ शकलेली नसल्याने, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर सिंदेवाहीसह चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करणे, दुबार पेरणीसाठी विशेष आर्थिक मदत देणे, पिक विम्याची नुकसान भरपाई तातडीने वितरित करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्ज पुनर्गठनाचा लाभ देणे, धानाला प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये हमीभाव देणे, स्मार्ट वीज मीटर बसवण्याची सक्ती थांबविणे, शेतीसाठी नियमित विजपुरवठा करणे, खराब रस्त्याची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्था, बेरोजगारासाठी रोजगार निर्मिती, शासकीय आरोग्य सेवा सक्षम करणे, तसेच प्रलंबित विकास कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.
शासनाने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी या मागण्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
यावेळी चंद्रभूषण जयस्वाल, प्रकाश बन्सोड, राजू वानखेडे, नागराज मेश्राम, ज्ञानेश्वर हांडेकर, आसिफ शेख, विजय जांभुळे, स्वप्निल कारमेंगे, सलीम पठाण, सुमेश नागदेवते, जगदीश मेश्राम, मनोज गरमळे, अजय लोणबले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.


