▪️परवानगीशिवाय बसवलेल्या ‘स्मार्ट मीटर’वर संताप..
▪️स्मार्ट मीटर कि ग्राहकांची स्मार्ट लूट..

डॉ. आनंदराव कुळे
मुल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल तालुक्यातील अनेक वीज ग्राहकांना यंदा वीज बिले दुप्पट-तिप्पट प्रमाणात आल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घरगुती ग्राहकांना अचानक वाढीव वीजबिलांचा फटका बसत असून, अनेकांचे मासिक आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, ग्राहकांची स्पष्ट संमती किंवा पूर्वपरवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आले, आणि त्यानंतरच वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत तसेच महावितरणच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, विना परवानगी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून टाकावेत, वाढीव वीजबिलांची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी इशारा दिला आहे की, प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल आणि महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
“स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?” असा सवाल आता मूल वाशीय वीज ग्राहक उपस्थित करत असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्वसामान्यांना न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



