▪️पाहिल्याच पावसात बोरामपल्ली नाल्यावरील लोकवर्गणीतून बांधलेला रपटा वाहून गेला, नागरिकांची गैरसोय..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील बोरामपल्ली नाल्यावरील लोकवर्गणीतून बांधण्यात आलेला रपटा पाहिल्याच पावसात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. गावातील नागरिकांनी स्वतःच्या आर्थिक योगदानातून व श्रमदानातून हा रपटा बांधला होता. मात्र, यावर्षीच्या पहिल्याच पावसात नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रपटा तुटून वाहून गेला.
रपटा वाहून गेल्यामुळे बोरामपल्ली तसेच परिसरातील गावांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शालेय विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले हे बांधकाम वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून कायमस्वरूपी व मजबूत रपटा अथवा पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तसेच पावसाळ्याच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात सिरोंचा तालुका भाकपाचे कार्यकर्ते रवि बारसागंडी यांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



