ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शेतकऱ्यांनी रब्बी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ

 

संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर

धुळे : दिनांक 5 डिसेंबर, 2023 ( इंडिया 24 न्यूज ) : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक पिकाचे उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करुन दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी रब्बी हंगाम 2023 पीकस्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ही पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे.त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जासत पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा उतारा, ८-अ उतारा, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र (केवळ अनुसूचित जमातीचा असल्यास) आवश्यक राहील. पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक, पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक राहील.तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील स्पर्धेत भाग घेतांना शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असली पाहिजे,व ती जमीन तो स्वतः कसत असला पाहिजे. तालुका पातळीवरील पिक स्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांना भाग घेता येईल. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील पिक स्पर्धेचे अर्ज शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांस एका वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल.

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क असेल. पीकस्पर्धेसाठी तालुकापातळीवर पहिले 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार रुपयांचे बक्षिस राहील. तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे बक्षिस 5 हजार रुपये असेल. तसेच राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार रुपये बक्षिस असेल. तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांचे विजेते निवडण्यात येतील.

रब्बी हंगामाच्या ज्वारी, गहू,हरभरा, करडई व जवस पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर,2023 अशी आहे. तीनही स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी परिपूर्ण भरलेला अर्ज कृषी सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी किंवा कृषी विभागाच्या www.krish.maharashtra.gov.in संपर्क साधावा. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.