ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राष्ट्रध्वजाच्या कामाने उंचावला दिव्यांगांचा आत्मविश्वास..

*🔹शिल्पा बनपुरकर*

*🔹 संपादक*

*🔹मो.न. 7030292628*

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शासनाने ‘ घर घर तिरंगा ’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शासनासह अनेक संस्था, संघटना सहभागी झाल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आयुष्यातील उमेदीचा काळ देशासाठी दिला. त्या सर्वांचं बलिदान आपण स्मरावं, देशाविषयी, राष्ट्रध्वजाविषयी आदर, सन्मान निर्माण व्हावा, यासाठी हा उपक्रम होती घेण्यात आला आहे. देशप्रेमाच्या याच भावनेनं जागृत झालेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील काही दिव्यांग भगिनींनीही आता या उपक्रमात सहभाग घेत खारीचा वाटा उचलला आहे. आपलं अपंगत्व विसरून स्वयंदीप दिव्यांग महिला निवासी संस्था आणि बचत गटामार्फत या भगिनी दिवभरात हजार ते बाराशे राष्ट्र्रध्वज शिवून तयार करीत आहेत.

‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम संपूर्ण देशभर साजरा केला जाणार आहे. प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी प्रत्येकांनी आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. या अभियानात कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज देण्याऐवजी कापडी ध्वज देण्याची योजना शासनाने आखली आहे.
‘घरोघरी तिरंगा’ ही मोहिमेतंर्गत जळगाव जिल्हा प्रशासनाने तिरंगा झेंडा शिवण्याचे काम चाळीसगावच्या स्वयंदीप दिव्यांग महिला निवासी संस्थेला दिले आहे. राष्ट्रध्वज शिवण्याचा मान मिळाल्याने या महिलांचा आत्मविश्वास उंचावला असून, आपण देशासाठी काही तरी करू शकलो, याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.

‘घरोघरी तिरंगा’बाबतचा शासन निर्णय वाचून स्वयंदीप दिव्यांग संस्थेच्या संचालिका मिनाक्षी निकम यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संपर्क साधला. आपल्या संस्थेला हे काम मिळाले तर संस्थेतील दिव्यांग महिलांना रोजगार तर मिळेलच शिवाय देशाची शान असलेला आणि स्वातंत्र्यदिनी घराघरांवर डौलात फडकणारा राष्ट्रध्वज आपल्या हातून तयार झालाय या विचाराने त्यांचा आत्मविश्वासही वाढेल, असा विश्वास मिनाक्षी निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केला. जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनीही लगेच निकम यांना होकार दिल्याने तिरंगा शिवण्यासाठी स्वयंदीप संस्थेच्या महिला मोठ्या उत्साहाने कामाला लागल्या आहेत.

” तिरंगा शिवण्याच्या कामात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे सहकार्य लाभले आहे.चाळीसगाव गट विकास अधिकारी यांनी 31 हजार तिरंगा शिवण्याचे काम दिले आहे. चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ठोंबरे यांनी 1 हजार तिरंगा शिवण्याचे काम देण्यात आले आहे.”

“देशासाठी अभिमान असलेल्या *हर घर तिरंगा* मोहिमेत दिव्यांगांना समावून घेता आलं याचं समाधान आहे. राष्ट्रध्वज तयार करण्याचे काम मिळाल्याने या सर्व दिव्यांग महिलांमध्ये नक्कीच आत्मविश्वास दुणावणार आहे.” -अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी जळगाव*

” सध्या या संस्थेत 80 ते 85 महिला काम करतात. यामध्ये निवासी केंद्रातील 25 दिव्यांग भगिनींसह काही विधवांचाही सहभाग आहे. हे काम मिळाल्यापासून संस्थेत एक प्रकारे आनंदाचे वातावरण असून, महिला दिवसभरात हजार ते बाराशे झेंडे तयार करताहेत. देशाविषयी अभिमान आणि देशाची शान असलेला ध्वज तयार करताना खूप अभिमान वाटत आहे. जबाबदारीचे भान ठेवून आम्ही हे काम करीत आहोत. यामुळे महिलांचा आत्मविश्वास यामुळे नक्कीच उंचावेल’
मिनाक्षी निकम, संचालिका स्वयंदीप दिव्यांग महिला निवासी संस्था, चाळीसगाव

“दिव्यांग असल्याने कोणाकडे हात पसरविण्यापेक्षा देशासाठीच्या कामात सहभागी घेणे कधीही चांगले. आमच्या हाताने राष्ट्रध्वज तयार होत असल्याने आत्मविश्वास यामुळे नक्कीच उंचावेल ” भारती चौधरी, दिव्यांग महिला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.