▪️ग्रामस्थांच्या सहभागातून नदी खोलीकरणाचे काम अनुकरणीय – जिल्हाधिकारी अभिनव गोयल
संपादक सौ. शिल्पा बनपुरका
धुळे – ( इंडिया 24 न्यूज ) : दि. 17 जून, 2024 (जिमाका वृत्तसेवा) – राजाराम फाऊंडेशन व कापडणे ग्रामस्थांच्या सहभागातून भात नदी खोलीकरणाचे काम इतर गावांसाठी प्रोत्साहनात्मक व अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
कापडणे येथील राजाराम फाऊंडेशन आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून भात नदीवरील मुक्तीधाम बंधार्याचे खोलीकरण सुरु आहे. या कामाची पाहणी आज जिल्हाधिकारी गोयल यांनी केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गटविकास अधिकारी गणेश चौधरी, विस्तार अधिकारी महंत, प्रा. केतन सुर्यवंशी, जल अभ्यासक भिला पाटील, उपसरपंच हरीश पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल पाटील, तलाठी वैशाली सोनवणे, प्रवर्तक उमेश पाटील, अध्यक्ष पांडुरंग पाटील, मंडळाधिकारी कल्याणी पाटील, ग्रामविकास अधिकारी मेघा भामरे, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, रोशन पाटील, सिध्देश पाटील, प्रशांत पाटील, योगेश पाटील, निशान पाटील, बाळू भडगावकर, जयवंत पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गोयल पुढे म्हणाले की, पाणीटंचाई निवारणासाठी नदी, नाल्यांचे खोलीकरण आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनातून आर्थिक विकास होत असतो. जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नदी संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजेत. जेणेकरून शहरे आणि गावे टंचाईतून मुक्त होण्यास मदत होईल. यावर्षी जिल्ह्यात पन्नास लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी नियोजन करायचे आहे. वृक्ष हे बिहारी आणि मियावाकी पध्दतीने लावायचे आहेत. दोनशे वृक्ष लावल्यानंतर एका मजूराला रोजगारही उपलब्ध होत असतो. सेंद्रीय शेती करा. यामुळे नदीही विषमुक्त होईल. फळबाग शेती करा. यातून पर्यावरणाचे मोठे संवर्धन होणार आहे. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रयत्न करा. नदीचे पुनर्जीवनासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
भात नदी पुनर्जीवनचे मुख्य प्रवर्तक उमेश पाटील म्हणाले, मला स्वातंत्र्य सेनानी राजाराम पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाली. गावातच पाणी उपलब्ध झाले तर रोजगारासाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. भात नदी बारमाही करायची आहे. शिवारातील सारे नालेही प्रवाहित करायचे आहे.
दरम्यान डी. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पाटील यांनी सुत्रसंचलन केले. उमेश पाटील यांनी आभार मानलेत. येथील स्वरा पाटील या विद्यार्थीनीने तिच्या पिग्गीबॅंकमधून वर्षभरात वाचविलेले पैसे नदी खोलीकरणासाठी दिलेत. तीने मला माझ्या गावाची नदी वाहतांना बघायची, अशी इच्छा व्यक्त केली. तीचा जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते यावेळी सत्कार करुन कौतुक करण्यात आले.