▪️शेतकऱ्यांनो, बदलत्या हवामानात ‘या’ पद्धतीनं घ्या पिकांची काळजी..!
सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी
मुंबई (इंडिया 24 न्यूज )हरभरा :गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होत आहे. अशातच हरभरा पीक काढणीस आले असेल तर काढणी, मळणी करून घ्यावी. मात्र मळणीनंतर हरभरा 6 ते 7 दिवस उन्हामध्ये वाळवावा. तसेच साठवणूक करताना त्यामध्ये 5% कडुनिंबाचा पाला घालावा त्यामुळे कीड लागत नाही.
कांदा : बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी 40 ग्रॅ. प्रती 10 लि. पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. तसेच कांदा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी घ्यावे.
भुईमूग :जर तुम्ही उन्हाळी भुईमुगाची लागवड केली असेल तर योग्यरीत्या पाण्याचं नियोजन करून 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम 5 ग्रॅ. किंवा कार्बोन्डेन्झिम 2 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 3 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम या पैकी एका जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.