दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका! हवामान विभागाचा अलर्ट
सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी
मुंबई (इंडिया 24 न्यूज )गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच हवामान विभागाने एक अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. विदर्भातील अकोला, वाशिम तसेच रत्नागिरी, पणजीम, अमरावती, पुणे या भागातील तापमानात सर्वात जास्त वाढ झाली असून पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होणार आहे.
काहीदिवसांपासून वातावरणात दिवसा उकाडा आणि रात्री थंडी पडत आहे. त्यामुळे वातावरण मिश्र स्वरूपाचे झाले आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी दिवसा कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस होत आहे तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेला किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आहे.
अशातच हवामान विभागाने दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका असा अलर्ट जारी केला आहे. तसेच वाढत्या तापमानाचा परिणाम धरण आणि तलावातील पाणीसाठ्यावर होत आहे. राज्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये 52.86 टक्के एवढा जलसाठा आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि सात मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात 23 टक्क्यांची घट झाली आहे.