▪️राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “नशा मुक्त भारत अभियान” जनजागृती कार्यक्रम संपन्न..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – (इंडिया २४ न्यूज ) : सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, मूल, जि. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यानिमित्ताने कृषि महाविद्यालय ते गांधी चौक, मूल दरम्यान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत १४ कर्मचारी व ९५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त समाजाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.
कार्यक्रमास डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषि महाविद्यालय, मूल हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या उदाहरणाद्वारे व्यसनाचे दुष्परिणाम स्पष्ट करत “चांगले काय व वाईट काय याची जाणीव ठेवून जीवन जगावे. नशा करणारे लोक कधीच खरे हिरो बनू शकत नाहीत,” असा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख अतिथी म्हणून सौ. ममता मोहन शेंडे (NCD समुपदेशक, उपजिल्हा रुग्णालय, मूल) यांनी व्यसन म्हणजे काय, लोक कशा प्रकारे व्यसनाच्या आहारी जातात, त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम तसेच शासनाच्या विविध योजना व कायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी सर्व उपस्थितांनी “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली.
सौ. मीना महादेव नंदनवार (ICTC समुपदेशक) यांनी विद्यार्थ्यांना मैत्रीच्या नात्यात वावरताना चांगल्या सवयी आत्मसात करण्याचे व कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास सौ. वैष्णवी प्रकाश ऐतवार (मास्टर्स इन क्लिनिकल सायकोलॉजी) यांची उपस्थिती होती. डॉ. आशिष लाडे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.



