लाभार्थ्यांना मोठा दिलासा, ‘या’ योजनांचे अनुदान मंजूर..
सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी
मुंबई (इंडिया 24 न्यूज )राज्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शासनाने दिलासा दिला असून अनुसूचित जमाती घटकांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांसाठी शासनाने 148 कोटी रुपयांचा निधी राज्यात वितरित केला आहे.
तसेच महत्वाचं म्हणजे या दोन्ही योजनांसाठीचा निधी लवकरच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील असंख्य लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमित भांगे यांनी दिली आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तवेतन योजनेचे अनुदान अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे या साठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु. 48 कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 100 कोटी रुपये असा एकूण 148 कोटी रुपये इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला आहे.
मागील आठवड्यातच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेतील सर्वसाधारण व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रु. 1197 कोटी इतका निधी वाटपासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना उपलब्ध करुन दिलेला असून, आता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीमुळे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.