विशेष लेख : प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार योजना..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही भारत सरकारची एक प्रमुख रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना आहे. या योजनेचा उद्देश औपचारिक रोजगाराला चालना देणे, प्रथमच नोकरी मिळविणाऱ्या युवकांना संघटित क्षेत्रात आणणे आणि नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे. योजनेअंतर्गत पात्र प्रथमच नोकरी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल 15 हजार रुपयापर्यंतची रक्कम दिली जाते. अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी नियोक्त्यांनाही दोन वर्षांसाठी प्रोत्साहन दिले जाते. उत्पादन क्षेत्राला अतिरिक्त दोन वर्षांचा लाभ देण्यात आला आहे.
99446 कोटींच्या एकूण खर्चासह ही योजना दोन वर्षात देशभरात 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. सुमारे 1.92 कोटी लाभार्थी प्रथमच संघटित क्षेत्रात प्रवेश करणारे असतील. ही योजना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या रोजगारांवर लागू आहे.
प्रथमच नोकरी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन : या योजनेमध्ये
नोंदणीकृत आणि दरमहा 1 लाखांपर्यंत वेतन मिळविणाऱ्या प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल 15 हजार पर्यंतची प्रोत्साहन रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. पहिला हप्ता सहा महिन्यांची सलग सेवा पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरा हप्ता बारा महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतर दिला जातो.
भाग व नियोक्त्यांसाठी सहाय्य: हा घटक सर्व क्षेत्रांमध्ये अतिरिक्त रोजगार
निर्माण करण्यासाठी नियोक्त्यांना प्रोत्साहन देतो. अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी नियोक्त्यांना प्रति अतिरिक्त कर्मचारी प्रति महिना कमाल 3 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन दोन वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाईल. मात्र संबंधित कर्मचारी किमान सहा महिने सातत्यपूर्ण सेवेत राहणे आवश्यक आहे.
उत्पादन क्षेत्रासाठी हे प्रोत्साहन अतिरिक्त दोन वर्षांसाठी वाढविण्यात आले आहे. ज्यामुळे तिसऱ्या आणि चवथ्या वर्षातही लाभ मिळेल. पात्र होण्यासाठी इपीएफओ नोंदणीकृत आस्थापनांनी किमान दोन अतिरिक्त कर्मचारी (50 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांसाठी) किंवा पाच अतिरिक्त कर्मचारी (50 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांसाठी) नियुक्त करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार योजना विशेषतः उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीस गती देईल आणि युवकांना औपचारिक रोजगार क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देईल. ही योजना रोजगाराच्या औपचारिकीकरणास आणि देशातील कोट्यवधी कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल. या योजनेने औपचारिक रोजगाराला चालना देणे आणि कर्मचारी व नियोक्ते दोघांनाही सहाय्य करणे यामध्ये आधीच उल्लेखनीय यश मिळविले आहे.
मार्च 2026 मध्ये योजनेच्या भाग अ अंतर्गत 4.41 लाख प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकूण 247 कोटींचे लाभ वितरित करण्यात आले. भाग ब अंतर्गत 17551 आस्थापनांना 214 कोटींची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली. ज्यामुळे अंदाजे 6.46 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण झाले.
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1019 आस्थापनांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे आणि 8406 नवीन कर्मचारी सामील झाले आहेत. त्यापैकी 6735 पुरुष कर्मचारी आणि 1671 महिला कर्मचारी आहेत. एकूण 8406 नवीन कर्मचाऱ्यांपैकी 6197 कर्मचारी हे 35 वर्षांखालील आहेत.
प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार योजने अंतर्गत होणारे हे आगामी लाभ
वितरण योजनेच्या अंमलबजावणीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. रोजगार
निर्मिती, कार्यबलाचे औपचारिकीकरण आणि सामाजिक सुरक्षा कव्हरेजचा विस्तार
यासाठी केंद्र सरकारची बांधिलकी या कार्यक्रमातून अधोरेखित होते. प्रधानमंत्री
विकसीत भारत रोजगार योजना ही विकसित भारताच्या दृष्टीकोनाच्या पूर्ततेसाठी
महत्त्वपूर्ण योगदान देणारी योजना म्हणून उदयास येत आहे.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) ची यशस्वी अंमलबजावणी साजरी करण्यासाठी, भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत नुकतेच 19 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2400 कोटी रुपयांची प्रोत्साहन रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे लाभार्थ्यांना जमा करण्यात आली.
या अंतर्गत होणाऱ्या या प्रोत्साहन वितरणामुळे 15 लाखांहून अधिक व्यक्तींना अतिरिक्त रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. देशव्यापी जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून देशभरातील 200 ठिकाणी एकाच वेळी प्रादेशिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशभरातील कार्यक्रमांमध्ये सुमारे 65 ते 70 हजर सहभागी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातीही 19 जून 2026 रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथेही अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.



