आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

29 व 30 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

▪️नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन..

 

संपादिका सौ. शिल्पाताई बनपुरकर

चंद्रपूर – ( इंडिया २४ न्यूज ) : दि. 28 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 29 व 30 जुलै 2026 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : अति मुसळधार पावसात नागरिकांनी घरात आश्रय घ्यावा, मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्यापासून दूर राहावे, रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळावे, खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवू नये, पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहावे.

वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करू नये : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे सोबतच मुसळधार पावसामुळे नदी नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून वाहत असेल तर ते ओलांडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.