▪️कर्जमाफी संदेशापासून सावध राहावे आरबीआयकडून बँकेच्या ग्राहकांना आवाहन..
संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर
धुळे, दिनांक 5 फेब्रुवारी, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिराती, संदेशावर विश्वास ठेवू नका, यापासून सावध रहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.के.शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, कर्जमाफी संदर्भात काही संस्था समाजमाध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब चॅनल आणि बनावट वेबसाइट) यावर अनेक मोहिमांचे सक्रियपणे प्रचार करीत असल्याचे दिसून आले आहे. अशा संस्थांना कोणत्याही अधिकाराशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी सेवा शुल्क आकारत असल्याच्या बातम्या आहेत. ज्यामुळे बँकांना आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता तारणावर त्यांचे अधिकार लागू करण्यासाठी बँकांच्या कामकाजात अडथळा येतो. बँकांसह इतर वित्तीय संस्थांची थकबाकी भरण्याची गरज नाही, असा चुकीचा अर्थ अशा संस्था देत आहेत. अशा कृतीमुळे वित्तीय संस्थांची स्थिरता आणि सर्वात महत्त्वाचे ठेवीदारांच्या हितास बाधा येत आहे. यामुळे हे देखील लक्षात घेतले जाऊ शकते. अशा संस्थांशी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी संबंध ठेवल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या समाजमाध्यमातील बँकाविषयाची खोट्या प्रचार मोहिमांना बळी पडू नये. खोट्या घटना आढळल्यास आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती द्यावी किंवा तक्रार नोंदवावी, असे परिपत्रक आरबीआयमार्फत जारी करण्यात आले आहेत. समाजमाध्यमावरील खोट्या प्रचार मोहिमा करणाऱ्या संस्थेच्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.के.शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.