▪️महावितरणकडून मोठी खुशखबर, ‘या’ ग्राहकांचे घरबसल्या ट्रान्सफर होणार वीज कनेक्शन..
सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी
मुंबई (इंडिया 24 न्यूज )राज्यातील नागरिकांना महावितरणने मोठा दिलासा दिला आहे. आता समजा जर कोणी जुने घर खरेदी केले असेल तर घराच्या जुन्या मालकाकडून वीज जोडणी कनेक्शन घराच्या नवीन मालकाच्या नावावर करायचे असेल तर होणारी धावपळ आता बंद होणार आहे. महावितरणने ‘ईज ऑफ लिव्हिंग’च्या उपक्रमांतर्गत एक नवीन व्यवस्था सध्या सुरू केली आहे.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर राज्यातील एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घर खरेदी झाली असेल तर महावितरण अशा व्यक्तींना संपर्क करून विजेची जोडणी या व्यक्तींपैकी कोणाच्या नावावर करायची आहे, हे विचारतील आणि आणि नवीन वीज जोडणी देणे सोपे होईल. कारण नियमानुसार नवीन वीज जोडणी ही एकाच व्यक्ती किंवा संस्थेच्या नावावर केली जात असते.
मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. ज्याने हे काम करणे महावितरणला सोपे होणार आहे. नोंदणी विभागात एखाद्या घराच्या नवीन मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जाईल. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस (मेसेज) पाठविला जातो. आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास सांगितले जाते. हे शुल्क ग्राहक घरबसल्या ऑनलाईनही भरू शकतात. यानंतर विजेची जोडणी त्याच्या नावावर होते.
दरम्यान यापूर्वी जर कोणी जुने घर खरेदी केले असेल आणि जुन्या मालकाकडून नवीन मालकाच्या नावावर वीज जोडणी कनेक्शन करायचे असेल तर संबंधित ग्राहकाला स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. आता नवीन व्यवस्थेमुळे घर खरेदी करणाऱ्या नवीन मालकाला वीज जोडणीसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार नाही. याशिवाय कागदपत्र दाखल करून पडताळणी किंवा पाठपुरावा करणे यासाठी हेलपाटे देखील मारावे लागणार नाहीत. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.