कापसाच्या दरात घसरण.. दरवाढीसाठी सरकारनं निर्यातीला प्रोत्साहन देणं गरजेचं.!
सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी
मुंबई (इंडिया 24 न्यूज )गेल्या हंगामात 11 ते 12 हजार रुपये क्विंटलच्या दरानं विक्री होणारा कापूस यंदा मात्र, 7 ते 8 हजार रुपय दरानं विक्री केला जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. चालू हंगामात शेतकऱ्यांना कापसाला किमान 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दर हवा आहे. हा दर कापड उद्योगांना महाग वाटत असल्यानं त्यांना कमी दरात कापूस हवा असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रति क्विंटलची अपेक्षा.
सध्या बाजारात रुईचे दर प्रतिखंडी 61 ते 36 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. देशात सरकीचे दर 3 हजार 600 ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने कापसाला 8 हजार 200 ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात सरकीचा दर प्रतिक्विंटल 3 हजार 400 रुपयांपर्यंत खाली आल्यानं कापसाचे दर कमी झाले होते. शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रतिक्विंटलची अपेक्षा आहे. अत्यावश्यक कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज. दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आपला कापूस घरात साठवूण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कापसाच्या दरात वाढ कधी होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. कापसाच्या दरात वाढ होण्यासाठी निर्यातीत सातत्य ठेवणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं निर्यातीला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.