▪️कंबालपेठा–मदाराम रोड देतो अपघातास आमंत्रण..
▪️रस्त्यावर पडले खड्डेच खड्डे, पंधरा दिवसांत दुरुस्तीची मागणी..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सिरोंचा–आलापल्ली महामार्गाला जोडणारा कंबालपेठा–मदाराम मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालविणे कठीण झाले असून हा मार्ग अपघातास आमंत्रण देत आहे.
रस्त्यावर इतके खड्डे निर्माण झाले आहेत की वाहन चालकांना खड्डे टाळण्यासाठी वळण घेत, कट मारत प्रवास करावा लागत आहे. अनेक वाहनधारकांचे छोटे-मोठे अपघातही या मार्गावर झाले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही व त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचे बांधकाम सुमारे चार वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच रस्ता पूर्णपणे खराब झाला असून जागोजागी तडे जाऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका सेवेलाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. कंबालपेठा–मदाराम मार्गाची पुढील पंधरा दिवसांत तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


