◼️संचलित हातभट्ट्यावर प्रशासनाचा मोठा बडगा ; गावात अवैध दारू आढळल्यास सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील अन् बिट अंमलदारावही थेट कारवाई!

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही :(इंडिया २४ न्युज ) राज्यात अवैद्य दारू विक्री आणि हातभट्टयाचे जाळे उध्वस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. जर आता एखाद्या गावाच्या हद्दीत हातभट्टी किंवा बेकायदा दारू विक्री असल्याचे आढळले, तर केवळ प्रत्यक्ष विकणाऱ्यावरच नव्हे, तर गावातील जबाबदार यंत्रणेसह सबंधित बिट पोलीस आणि पोलीस प्रशासनावरही कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे.
काय आहे प्रशासनाचा नवा आदेश?
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कठोर तरतुदी आता अंमलात आणल्या जात आहेत. या नियमानुसार गावात बेकायदेशीर मद्यनिर्मिती होतेय, याची माहिती असूनही ती लपविणाऱ्या किंवा डोळे झाक करणाऱ्या स्थानिक प्रशासनासह खाकी वर्दीतील दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरले जाणार आहे.
कोण कोणावर होणार कारवाई
▪️बिटअंमलदार व पोलीस कर्मचारी:
संबंधित गावाचा ताबा व हद्दीची जबाबदारी असणाऱ्या बीट अंमलदाराच्या क्षेत्रात जर अवैद्य धंदे सुरू राहिले आणि त्यांनी वरिष्ठांना अंधारात ठेवले, तर त्यांच्यावर खात्यांतर्गत चौकशीसह निलंबनाची कारवाई केली जाईल. अवैद्य धंद्याशी हातमिळवणी किंवा हप्ताखोरी सिद्ध झाल्यास थेट बडतरफिची कारवाई टाळता येणार नाही.
🔸पोलीसपाटील व सरपंच:
गावातील अवैध धंद्याची माहिती दडवून ठेवल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास पोलीस पाटील आणि सरपंचाचे मानधन व भत्ते तात्काळ थांबवले जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
🔹ग्रामसेवक व तलाठी:
गावपातळीवर शासकीय नियमांची अंमलबजावणी न केल्यास ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई आणि निलंबनाची टांगती तलवार कायम राहणार आहे.
▪️कच्चामाल पुरवठादार :
केवळ दारू गाळणारेच नव्हे, तर बेकायदेशीर हातभट्टीसाठी लागणारा गुळ, खांडसरी मळी किंवा इतर कच्चामाल पुरवठा करणाऱ्यावरही कायदेशीर शिकंजा कसला जाणार आहे.
🔺 प्रशासनाचा सज्जड दम :
विषारी दारू प्रकरणामुळे आणि वाढत्या अवैध धंद्यामुळे गावाचे स्वास्थ धोक्यात आल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना खडसावले आहे. गावातील अवैद्य अड्डयावर यापुढे बुलडोझर कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्रामपातळीवरील पदाधिकाऱ्यांसह बीट पोलिसांनाही “आम्हाला माहिती नव्हती ” असे म्हणण्याचे दिवस संपले असून, आपल्या हद्दीतील अवैद्य धंदे स्वतःहून बंद करून, कठोर पावले उचलणे बंधनकारक करण्यात आले आहे.
” गावात दारू बनवणारे, वाहतूक करणारे किंवा कच्चामाल पुरवणाऱ्याची माहिती मिळताच ती तात्काळ उत्पादन शुल्क विभागाला आणि पोलिसांना देणे बंधनकारक आहे. कारवाईत कसूर किंवा कुलगुरूपणा आढळल्यास बीट पोलिसांसह सबंधित कोणाचीही शिथीलता सहन केली जाणार नाही.



