▪️सिरोंचा तालुक्यातील मादरम ग्रामपंचायतीत पाणीटाकी उभी पण दीड वर्षांपासून थेंबही नाही..!

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील मादरम ग्रामपंचायत हद्दीत लाखो रुपये खर्च करून उभारलेली पाणीटाकी दीड वर्षांपूर्वी पूर्ण झाली असली तरी आजपर्यंत गावकऱ्यांच्या नळातून एक थेंबही पाणी आलेले नाही. परिणामी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना प्रशासनाने पाणीटाकीचे बांधकाम करून केवळ कागदोपत्री काम पूर्ण दाखवले आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात पाईपलाईन जोडणी, वीजपुरवठा, मोटार बसविणे किंवा पाण्याचा स्रोत याबाबत कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने ही पाणीटाकी केवळ शोभेची वस्तू ठरत आहे.
महिलांना आणि नागरिकांना आजही विहिरी, हँडपंप किंवा लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असून उन्हाळ्याच्या तोंडावर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
“मादरम गावातील पाणीटाकी तात्काळ सुरू करून ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल,” अशी कडक भूमिका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.



