▪️प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : ३ जून 2026: छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत दि. २९ मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक १५ हजार घरांवर प्रकल्प बसविण्यात आले असून त्यापैकी ४,७०० घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले असून राज्याने ६ लाखापेक्षा अधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या निवडक राज्यांच्या गटात प्रवेश केल्याबद्दलही कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीने वेग घेतला आहे. मे महिन्यात योजनेसाठी सादर अर्जांमध्ये देशात प्रथम क्रमांक, प्रकल्प बसविलेल्या एकूण घरांमध्ये दुसरा क्रमांक, प्रकल्पांच्या तपासणीमध्ये पहिला क्रमांक आणि पुरवठादारांच्या नोंदणीमध्ये दुसरा क्रमांक अशा रितीने या योजनेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या पाच टॉपर राज्यांमध्ये समाविष्ट झाला आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात महावितरणमार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. या यशाबद्दल राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरगुती वीज ग्राहकांना घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी थेट अनुदान मिळते. एक किलोवॅटच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. या योजनेच्या अंमलबजावणीत वीज ग्राहकांकडून अर्जांची स्वीकृती, प्रत्यक्ष प्रकल्प बसविणे आणि त्याची तपासणी करून तो सुरू करणे हे तीन महत्त्वाचे टप्पे असतात. मे महिन्यात या योजनेसाठी देशभर विशेष अभियान चालविण्यात आले होते त्यामध्ये महाराष्ट्र राज्य टॉपर ठरले आहे.
योजनेसाठी मे महिन्यात प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये ४ लाख ४९ हजार अर्जांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात (३ लाख), उत्तर प्रदेश (१ लाख), राजस्थान (४४ हजार) व केरळ (३५ हजार) या राज्यांचा महाराष्ट्रानंतर क्रमांक लागतो.
छतावर सौरऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य ५४ हजार प्रकल्पांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याबाबतीत उत्तर प्रदेश (६४ हजार), गुजरात (३५ हजार), राजस्थान (२६ हजार) व केरळ (२० हजार) ही अन्य राज्ये टॉप पाच राज्यांमध्ये आहेत.
छतावर बसविलेले सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प तपासण्याच्या बाबतीही महाराष्ट्र राज्य ६९ हजार प्रकल्पांसह पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश (६४ हजार), गुजरात (४२ हजार), राजस्थान (२७ हजार) व केरळ (१८ हजार) ही राज्ये महाराष्ट्रानंतर टॉप पाचमध्ये समाविष्ट आहेत.
छतावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याचे काम नोंदणीकृत कंत्राटदारांमार्फत केले जाते. ग्राहकाला आपल्या पसंतीप्रमाणे कंत्राटदार निवडता येतो. कंत्राटदारांच्या नोंदणीमध्ये ४१३ कंत्राटदारांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश (७७९), गुजरात (२१०), आसाम (१८१) व राजस्थान (१७७) ही सर्वोच्च कामगिरीच्या पाचपैकी अन्य राज्ये आहेत.



