दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी.!
सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी
मुंबई (इंडिया 24 न्यूज )आळंदीत पालखी सोहळ्याला गालबोट, पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीमार
आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. वारकऱ्यांची गर्दी झाल्यानं पोलिसांना वारकऱ्यांना आवरणं कठीण झालं. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. आळंदीच्या मंदिराबाहेर हा प्रकार घडला आहे. पालखी सोहळ्यावेळी मानाच्या वारकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जातो. मात्र इथं वारकऱ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.
मोठी बातमी ! राज्य सरकारकडून तब्बल 1.27 लाख रेशन कार्ड रद्द
राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ‘एक घर, एक रेशनिंग कार्ड’ योजनेअंतर्गत डुप्लिकेट शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे. छाननीनंतर यातील 1 लाख 27 हजार रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 24 हजार 821 डुप्लिकेट शिधापत्रिका आढळून आली.
अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल, बिपरजॉय चक्रीवादळाचा जोरही वाढला
सर्वांचीच प्रतिक्षा संपलेली आहे. अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचं 11 जूनला महाराष्ट्रात आगमन झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावासाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. तर बिपरजॉय चक्रीवादळही तीव्र झाले आहे.