▪️जीवनात खऱ्या आनंदासाठी शांती व मोक्ष प्राप्तीची आसक्ती असावी. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
पुणे शिंदवणे – ( इंडिया 24 न्युज ) : तमगुण हा तापदायक नरका समान असून जीवनात दुःख निर्माण करतो. रजगुणामुळे प्रबळ मायाजाळ निर्माण होते. त्यामुळे धनाची आसक्ती निर्माण होते. सत्व गुणाच्या सामर्थ्यामुळे अहर्निश परमार्थ करण्याची चालना मिळते, त्यामुळे आत्मिक समाधान मिळते म्हणून सत्वगुणाचा अंगीकार करावा यासाठी अध्यात्म विद्या महत्त्वाची असून जीवनात शांती व मेल्यानंतर मोक्षप्राप्तीची ज्यांना खात्री आहे ते जगात सुखी समाधानी आहेत. शांती व मोक्ष प्राप्तीसाठी आसक्ती असेल तरच जीवनात खरा आनंद मिळतो. यासाठी साधुसंतांनी, योगी, महर्षी, ऋषी, मुनी , तपस्वी, राजेमहाराजे यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. म्हणून जीवनात खऱ्या आनंदासाठी शांती व मोक्ष प्राप्तीसाठीची आसक्ती असावी, असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे महाराज यांनी येथे व्यक्त केले. शिंदवणे येथे गंगा भागीरथी कै. लिलाबाई रामकिसन जराड यांच्या दशक्रिया निमित्ताने अध्यात्मिक प्रवचनाचे व शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आपल्या प्रवचन रुपी सेवेत डॉ. रवींद्र भोळे पुढे म्हणाले की मृत शरीराला आत्म्यामुळे महत्त्व असते. ज्याप्रमाणे मनुष्याचा प्राणीमात्रांचा प्रवास हा जीवनभर सुख दुःखाने भरलेला असतो ,त्याचप्रमाणे आत्म्याचा ही प्रवास शरीर मृत झाल्यानंतर सुरू होतो. जीर्ण झालेले कपडे आपण ताज्य करतो व नवीन कपडे परिधान करतो तद्वतच आत्मा सुद्धा जीर्ण शरीराला सोडून देतो व आपल्या नवीन प्रवासाला निघतो. म्हणून जीवात्म्याला ,आत्म्याला शांती मिळण्यासाठी हे ब्रह्मज्ञान समजण्यासाठी अध्यात्म विद्या महत्त्वाची आहे.मृत व्यक्तींच्या अंत्यष्टी, दशक्रिया विधी, तेरावे व श्राद्ध हे मातृपितृ यज्ञ म्हणून करणे अत्यंत गरजेचे आहे. मृतांसाठीचा एक यज्ञ आहे. या प्रसंगी परिसरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर नेते , विविध गावचे सरपंच , पंचक्रोशीतील गावकरी ,भाविक भक्त, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.