▪️तलावाचे पाणी रस्त्यावर रहदारीस अडथळा..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्यूज ) : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै ते पोटेगाव या मुख्य मार्गावरील कुनघाडा रै येथील आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्यावर तलावातील येव्याचे पाणी नियमित रस्त्यावर साचून राहत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. पाण्याचा विल्हेवाट लावून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यात कुनघाडा रै हे गाव लोकसंख्येने व विस्ताराने बरेच मोठे आहे. परिसरातील खेड्यांची बाजारपेठ म्हणून गाव ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून येथील आठवडी बाजार रस्त्यावर गाव तलाव आहे. पूर्वी धुणीभांडी व शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी तलावाचा वापर केला जात होता. गणेश विसर्जन सुध्दा तलावातच केले जात असत मात्र सध्यातरी तलावाची कुठलीच दुरुस्ती झाली नसल्यामुळे तलावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर मटण मार्केटच्या बाजूला तलावातील अतिरिक पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे. मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी नालीचे बांधकाम झाले नसल्यामुळे तलावाचे पाणी थेट मुख्य रस्त्यावर येत असते. हनुमान राईस मिलच्या समोर पाणी साचून राहत असल्यामुळे तेवढ्या भागातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. सदर कुनघाडा रै ते पोटेगाव मार्ग चोवीस तास सुरू असतो. या मार्गाने गडचिरोली ते पोटेगाव व गडचिरोली ते माल्लेर माल एस टी महामंडळाची बस जात असते. याच मार्गावर आठवडी बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा आहेत . त्यामुळे बाजार करणाऱ्या नागरिकांना, प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रुग्णांना व शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याने जाताना फार मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावरील पाण्याचा विल्हेवाट लावून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.



