▪️“मी म्हणेन तोच कायदा!” – आलापल्लीत वन अधिकाऱ्याविरोधात कर्मचाऱ्यांचा बंड..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
आलापल्ली – ( इंडिया 24 न्युज ) : आलापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या (RFO) विरोधात वन कर्मचाऱ्यांनी उघडपणे आंदोलन छेडत प्रशासनाला धक्का दिला आहे. “मी म्हणेन तोच कायदा, मी खूप इमानदार आहे, माझं सगळे ऐकतात” अशा कथित वक्तव्यांमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता थेट रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला आहे.
वन विभागात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अंतर्गत तणावाला अखेर वाचा फुटली असून, कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत संबंधित अधिकाऱ्याविरोधात जोरदार आंदोलन उभारले आहे. या आंदोलनामुळे विभागातील वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते शंकर डोलगे यांनीही या प्रकरणात उडी घेत गडचिरोली येथील वन मुख्यालयात आंदोलन सुरू केले आहे. “वन कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असताना वरिष्ठ अधिकारी मौन बाळगून आहेत. चौकशी का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, संबंधित अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असून, कर्मचाऱ्यांना दबावाखाली ठेवले जात आहे. “वरिष्ठ अधिकारी माझं काहीच करू शकत नाहीत” अशा गर्विष्ठ वृत्तीमुळेच हा वाद चिघळल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, खुद्द वन कर्मचाऱ्यांनीच RFO च्या विरोधात आंदोलन करून “कोण खरे आणि कोण खोटे” हे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या आंदोलनानंतरही अद्याप कोणतीही ठोस चौकशी सुरू झाल्याचे दिसत नाही, ही बाब चिंतेची आहे.
आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
⚠️ मुख्य मागण्या:
संबंधित RFO अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी
कर्मचाऱ्यांवरील कथित दबाव व अन्याय थांबवणे
दोषींवर कडक कारवाई
ही घटना वन विभागातील अंतर्गत व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून, पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



