▪️कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी १९ जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक..
▪️आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : कोळसाखाणीच्या कामकाजामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. त्यांच्या मागणीनुसार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा. श्री. विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीची महत्त्वपूर्ण बैठक १९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. कोळसाखाणीमुळे शेतजमिनी, पिके व उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यासंदर्भात आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.
कोळसा उत्खनन व संबंधित औद्योगिक उपक्रमांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेती उत्पादनात घट, पिकांचे नुकसान, पर्यावरणीय परिणाम तसेच उपजीविकेवर होणारा परिणाम यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि नुकसानभरपाईची पारदर्शक व प्रभावी यंत्रणा निर्माण व्हावी, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत हा विषय प्रभावीपणे मांडत कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी पोटतिडकीने लावून धरली होती.
१९ जून रोजी होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यातील कोळसाखाणीग्रस्त भागातील वास्तव परिस्थिती, शेतकऱ्यांच्या तक्रारी, नुकसानाचे स्वरूप तसेच नुकसानभरपाईसाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजनांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. बैठकीत होणाऱ्या चर्चेच्या आधारे कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची प्रक्रिया, आवश्यक निकष आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असल्याने ही बैठक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
कोळसाखाणीमुळे बाधित शेतकरी, नागरिक तसेच संबंधित गावांतील ग्रामस्थांच्या समस्या शासनाच्या सर्वोच्च स्तरावर प्रभावीपणे मांडल्या जाव्यात आणि नुकसानभरपाईबाबतची कार्यपद्धती वास्तव परिस्थितीला अनुसरून निश्चित व्हावी, यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नागरिकांनी आपल्या सूचना, तक्रारी, मागण्या तसेच कोळसाखाणीमुळे होत असलेल्या नुकसानाची माहिती स्वीय सहायक श्री. संजय राईंचवार यांच्या ९५५२७९९६०८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी. प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व महत्त्वाचे मुद्दे १९ जून रोजी होणाऱ्या बैठकीत अपर मुख्य सचिव मा. श्री. विकास खारगे यांच्या समक्ष मांडण्यात येणार असून त्यावर आवश्यक कार्यवाहीसाठी प्रभावी पाठपुरावा केला जाणार आहे.



