▪️गुम्मलकोंडा गाव दूर नाही, पण रस्ता नाही, CPI ने मांडली युवकांची व्यथा..

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि उज्वल देवनाथ
सिरोंचा – इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला तसेच सुंकरली ते असरअल्ली या गावांना जोडणाऱ्या पक्क्या डांबरी रस्त्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) तर्फे जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन तहसीलदार,श्री सिडाम साहेब सिरोंचा यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्वातंत्र्याची ७५ वर्षांहून अधिक काळ उलटूनही या भागातील दलित, आदिवासी व कष्टकरी नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. विशेषतः रस्त्याअभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण बनले आहे.
पावसाळा सुरू होताच या मार्गावर गुडघाभर चिखल साचतो. त्यामुळे रुग्णवाहिका (१०८) वेळेवर गावात पोहोचू शकत नाही. गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त किंवा गरोदर महिलांना खाटेवर किंवा झोळीत टाकून चिखलातून मैलोन्मैल पायी मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याची वेळ येते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, रस्ता अत्यंत खराब व घसरडा असल्याने दुचाकी अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक नागरिक जखमी होत असून वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसत आहे.
या रस्त्याअभावी सामाजिक जीवनावरही गंभीर परिणाम झाला आहे. गावात रस्ता नसल्यामुळे बाहेरगावचे लोक येण्यास टाळाटाळ करतात. परिणामी येथील युवकांच्या विवाहात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून अनेक सुशिक्षित युवकांचे संसार थांबले आहेत. “गाव दूर नाही, पण रस्ता नाही” या स्थितीमुळे युवकांची हतबलता वाढत असल्याचे CPI ने नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षणही यामुळे धोक्यात आले आहे. पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद होत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची वेळ येत आहे.
याशिवाय, रस्त्याअभावी नागरिकांना तहसील व इतर शासकीय कार्यालयांमध्ये पोहोचणे कठीण होत आहे. परिणामी विविध शासकीय कामे व योजना प्रलंबित राहिल्या आहेत.
CPI च्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
१) गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला, सुंकरली ते असरअल्ली या संपूर्ण मार्गाला विशेष निधीतून तात्काळ पक्का डांबरी रस्ता म्हणून प्रशासकीय व आर्थिक मंजुरी द्यावी.
२) पावसाळ्याचा विचार करून तात्काळ रस्त्यावरील चिखल काढून खडीकरण करून तात्पुरती दुरुस्ती करावी.
दरम्यान, प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दखल घेतली नाही, तर CPI च्या नेतृत्वाखाली सर्व बाधित गावांतील नागरिक, युवक, महिला व विद्यार्थी यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन, जेल भरो व चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जि. सदस्य कॉ. सुरज जककुलवार, तालुका सचिव कॉ. रवी बारसंगडी, कॉ. देवीदास लाटकरी, कॉ. इंद्रकुमार गोगुला, कॉ. महेश कोंडागुर्ला, कॉ. संजय गोगुला, कॉ. रमेश कोंडागुर्ला, कॉ. विश्वेश्वर लाटकरी, कॉ. सडवली लाटकरी, कॉ. राजना लाटकरी, कॉ. महेंद्र कोंडगुर्ला, कॉ. हरियांत कुंमरी, कॉ. विनीतकुमार जनगाम, कॉ. नवीन कुंमरी, कॉ. उष्णन चिनमुला तसेच ग्रामस्थ व भाकपा सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



