ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा सिरोंचा तालुक्यातील रंगायापल्ली व आरडा गावांचा दौरा..

▪️शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीचे मार्गदर्शन..

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि : उज्वल देवनाथ

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी नुकताच सिरोंचा तालुक्यातील रंगायापल्ली व आरडा या गावांना भेट देऊन कृषी विकास कामांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (NDKSP 2.0)’ अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत शेतकऱ्यांना ‘शेती बचाओ अभियान’, खतांचा संतुलित वापर तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना श्रीमती हिरळकर यांनी शेतीचा खर्च कमी करून उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी ‘शेती बचाओ अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. शेतीला केवळ व्यवसाय न मानता ती एक शाश्वत जीवनपद्धती म्हणून जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (NDKSP 2.0) हा हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचा उपक्रम असून, शेतकऱ्यांनी हवामानास अनुकूल पीक पद्धती स्वीकाराव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रकल्पांतर्गत उपलब्ध विविध अनुदाने, तांत्रिक सुविधा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेती अधिक फायदेशीर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दौऱ्यादरम्यान त्यांनी रंगायापल्ली व आरडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, आगामी खरीप हंगामाची तयारी आणि शेतीविषयक विविध प्रश्न जाणून घेतले. जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षणाच्या अहवालानुसारच खतांचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

“अंधाधुंद रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो आणि उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे नत्र, स्फुरद व पालाश (NPK) यांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवून जमिनीची सुपीकता कशी वाढविता येईल, याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.

हवामानातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता त्यांनी शेतकऱ्यांना ‘एल निनो’ संदर्भात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. एल निनोमुळे पावसाच्या वितरणात होणारे बदल, दीर्घकालीन पावसाचा खंड किंवा अतिवृष्टी यांसारख्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच पीक नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड तसेच पीक विमा योजनेत सहभाग नोंदविण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी श्री. सी. यू. पाणबुडे, मंडळ कृषी अधिकारी कु. सपना रहासे, आत्मा बीटीएम श्री. लांजेवार, तालुक्यातील उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, गावांचे सरपंच तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या या मार्गदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक, शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल शेतीबाबत नवी उमेद निर्माण झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.