▪️अखिल भारतीय जाती जमाती विकास परिषदेचा नागपूरात ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा..
▪️“SC-ST चे संविधानिक हक्क अबाधित राखणे ही काळाची गरज” – माजी आमदार डॉ. देवराव होळी

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
नागपूर – ( इंडिया 24 न्युज ) : अखिल भारतीय जाती जमाती विकास परिषदेच्या वतीने नागपूर येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अत्यंत उत्साहात व जोशात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून माजी आमदार तथा परिषदचे राष्ट्रीय महासचिव डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित राहून समाजबंधूंना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमात लागलेल्या स्टॉल चे उदघाटन केले. या कार्यक्रमाची अध्यक्षता प्रदेश अध्यक्ष इंजि. Ravi सोमकुवर, प्रमुख अतिथी डॉ. ऋषिकेश मेश्राम प्रदेश महासचिव, माया इनवाते पूर्व महापौर, राष्ट्रीय सचिव, डॉ. मुक्रिंदा जोगेकर अध्यक्ष काटोल, नरखेड आदी उपस्तित होते.
या प्रसंगी बोलताना डॉ. होळी यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन करून समाजाला समता, बंधुता व न्यायाच्या मार्गावर नेले. हा दिवस फक्त धार्मिक नाही तर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्रांतीचा दिवस आहे. अन्याय, विषमता व शोषण संपविण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माच्या शिकवणीचे अनुसरण करणे आजच्या पिढीसाठी अत्यावश्यक आहे.”
डॉ. होळी यांनी पुढे असेही सांगितले की, SC-ST समाजाचे संविधानिक अधिकार अबाधित ठेवणे, त्यांचे रक्षण करणे व त्यासाठी सजग राहणे ही काळाची गरज आहे. त्यांनी समाजातील युवकांनी संघटित होऊन शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व युवक-युवती उपस्थित होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी “आंबेडकरांनी दिलेला मार्ग स्वीकारून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा” संकल्प केला.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय जाती जमाती विकास परिषदेच्या डॉ. माया गायकवाड, डॉ. कुमरे, मनोहर मेश्राम, मिलिंद सोनकांबळे, अंजु मेश्राम, मला मेश्राम, कला रामटेके, इंदू गजभिये, अरविंद सोळंके, आनंद भांगे, संदीप नवगावे, प्रवीण पाटील, चंद्रशेखर देशभ्रतार, सुषमा कांबळे, इंदू फुले, भालचंद्र रामटेके, संतोष गणवीर आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



