▪️अनकोडा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; रस्ता बनला नाल्यासारखा, नागरिक त्रस्त..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनकोडा गावात ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यावरून सतत पाणी वाहत असल्याने रस्ता अक्षरशः नाल्यासारखा बनला असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील अनेक दिवसांपासून रस्त्यावर साचलेले आणि वाहणारे पाणी यामुळे चिखल, घसरडी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला असून, पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा अधिक फटका बसत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “कर आकारणी होते, पण सुविधा मात्र मिळत नाहीत,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
तात्काळ उपाययोजना करून रस्त्यावरील पाण्याचा निचरा करावा आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.



