▪️चांगल्या रस्त्यांचा हक्क हा नागरिकांचा मूलभूत अधिकार..
▪️कागदोपत्री काम पूर्ण, प्रत्यक्षात दर्जाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
नागभीड – ( इंडिया 24 न्युज ) : चांगल्या रस्त्यांचा हक्क
सर्वोच्च हक्क (कलम २१) आणि सुस्थितीतील व्यक्ती हा जगन्याच्या हक्काचा (जगण्याचा अधिकार) एक महत्त्वाचा भाग आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.खड्डे मुक्त रस्ते घटनेतील मूलभूत हक्क आहे. पण ग्रामीण भागातील रस्ते तयार होत असताना दर्जा राखला जात नसल्याचे दिसून येत आहे.
नागभीड ते कोथुळणा या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, हा रस्ता पाहता ‘काम झाले तरी कशासाठी?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत (CMGSY) लाखो रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता आज पूर्णपणे उखडलेला, खडी बाहेर आलेली आणि ठिकठिकाणी खड्ड्यांनी भरलेला दिसून येत आहे.
या रस्त्याच्या कामाची देखभाल कालावधी आधीच संपलेली आहे, मात्र धक्कादायक बाब म्हणजे देखभाल कालावधीमध्येही कंत्राटदाराकडून कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी रस्ता काही वर्षांतच अक्षरशः नासधूस झाला असून, कामाच्या दर्जावर तसेच संबंधित विभागाच्या नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या रस्त्याचे काम ज्या कंत्राटदारामार्फत करण्यात आले, त्याने केवळ कागदोपत्री काम पूर्ण करून प्रत्यक्षात दर्जाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. शासनाचा निधी खर्च झाल्याचे दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या वाट्याला अपघात, धोकादायक प्रवास आणि त्रासच येत असल्याचे चित्र आहे.
नागभीड–कोथुळणा रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक, गर्भवती महिला, सायकलस्वार तसेच दुचाकी वाहनचालक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. रस्त्यावर साचलेली खडी आणि उखडलेला थर यामुळे वाहने घसरून पडण्याचे प्रकार वारंवार घडत असून, अनेक वेळा अपघात झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र या गंभीर परिस्थितीकडे संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
“रस्ता बांधण्यासाठी योजना असतात, निधी मंजूर होतो, पण दर्जेदार काम आणि देखभाल कुठे जाते?” असा थेट सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेली रक्कम, कामाचा कालावधी, देखभाल कालावधी आणि संबंधित कंत्राटदाराची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
तसेच या रस्त्याच्या कामाची तांत्रिक चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागभीड–कोथुळणा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.



