◼️ सौर पंपाऐवजी नियमित विद्युतपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही (इंडिया २४ न्यूज) दि.१८/०२/२०२६
राज्यात शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. दुय्यम पिके घेण्यास प्रोत्साहन देण्यात येत असून, त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या शेतात बोरवेल खोदल्या आहेत. मात्र बोरवेलला नियमित विद्युत पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वीजपुरवठा ऐवजी सौर उर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. सौर पंपाद्वारे दिवसा पाण्याचा उपसा करून साठवणूक केली जाते, परंतु रात्री पंप बंद राहात असल्याने पाण्याचा पुरेसा वापर करता येत नाही. विशेषता उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असूनही, वेळेअभावी व मर्यादित उपशामुळे योग्य वेळी पाणी देता येत नाही, परिणामी अनेक शेतकरी सौर पंप बसवूनही उन्हाळी पिके घेत नाहीत.

कर्ज काढून बोरवेल खोदूनही अपेक्षित फायदा होत नसल्याची भावना शेतकऱ्यात व्यक्त होत आहे. यामुळे भविष्यात बोरवेल खोदण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासन कितीही योजना राबवित असले तरी, नियमित व पुरेसा विद्युत पुरवठा न मिळाल्यास शेतीत अपेक्षित सुधारणा होणार नाही असे शेतकऱ्याचे मत आहे.
शेतीसाठी सातत्यपूर्ण विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिल्यास, विहीर व बोरवेलच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन सुधारेल आणि उत्पादन वाढीस चालना मिळेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सौरपंपा ऐवजी नियमित विद्युत पुरवठा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



